Wednesday 20 June 2012

महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती



* * चला माहिती करून घेऊया गडकोटांबद्दल * *
भाग 1



महाराष्ट्रात गडकोट वैभव गिरी-दुर्गांच्या पहाऱ्यातून विपुल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग असे सांगत साल्हेर अहिवंतापासून जिंजी तंजावरपर्यंत दुर्गाची एक प्रचंड शृंखला उभारून स्वराज्य सुरक्षित करून ठेवले.दुर्गमता हा गडाचा गाभा होता. शत्रूकडे असलेल्या हत्याराच्या ताकदीवर दुर्गाची रचना अवलंबून असे.प्राचीन काळी वस्तीभोवती काटेरी झाडे टाकून वस्तीचे रक्षण करण्यात येई. नंतर लाकडाचे परकोट उभारण्यात येऊ लागले. मग दगडाची रचाई झाली.शेवटी दगड तासून पक्की तटबंदी उभारण्यापर्यंत मजल गेली.अशी तटबंदी असलेल्या ग्रामांना 'पूर' म्हणत असत.तरीही शत्रू बलाढ्य असेल, तर या तटबंदीयुक्त पुराचा पराभव अटळ असे. अशा वेळी गिरी-दुर्गाची रचना करण्यात आली. मात्र, असे गिरी दुर्ग बाधण्याचा खर्च अपरमित असे, परंतु संरक्षण या एकमेव कारणासाठी तो खर्च करणे अपरिहार्य असे. भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊन,त्याची दुर्गमता अभ्यासून अशा ठिकाणी दुर्गाची निर्मिती केल्यामुळे किंवा दुर्ग उभारल्यामुळे शत्रूपासून संरक्षण मिळत असे.मात्र, हेच गडकोट अधिकाधिक बलाढ्य करण्यात मनुष्याचे बुद्धीचातुर्य पणाला लागले. त्यातील बारकाव्यांचा अभ्यास केला गेला व त्यातूनच बेलाग दुर्ग उभारले गेले. परिस्थितीशी सांगड घालून अधिकाधिक दुर्गम ठिकाणी गडकोटांची उभारणी केली गेली. वास्तुरचना, स्थापत्यशास्त्र यांचा कस पणाला लाऊन अशा गडकोटांची निर्मिती झाली.आपल्याकडील अनेक जुन्या ग्रंथांमधून दुर्गांच्या प्रकाराची माहिती मिळते. मनुस्मृतीच्या सातव्या अध्यायात दुर्गांबद्दल केलेली चर्चा आली आहे. त्याचा आशय असा आहे- 

'राजाने दुर्गांच्या जवळ वसवलेल्या नगरातच आपले वास्तव्य ठेवावे.'

असे सहा प्रकारचे दुर्ग आहेत 

१. धनुदुर्ग - ज्याच्या आजूबाजूस वीस कोसपर्यंत पाल नाही, त्यास 'धनदुर्ग' म्हणतात

२. महीदुर्ग - ज्याला बारा हातांपेक्षा अधिक उंच तटबंदी आहे, युद्धाचा जर प्रसंग आलाच तर ज्यावरून व्यवस्थित पहारेकर्यांना फिरता येईल, ज्याला झारोक्यानी युक्त अशा खिडक्या ठेवल्या आहेत, अशा दुर्गास 'महादुर्ग' असे म्हणावे.

३. अब्ददुर्ग किंवा जलदुर्ग - अपरिमित जलाने चोहोबाजूंनी वेढलेल्या दुर्गास 'अब्ददुर्ग' किंवा 'जलदुर्ग' अशी संज्ञा आहे.

४. वाक्ष्रदुर्ग - तटाच्या बाहेर चारी बाजूला चार कोसापर्यंत मोठमोठे वृक्ष,काटेरी झाडे,कळकाची बेटे आणि वेलींच्या जाळ्या यांनी वेष्टीलेल्या दुर्गास वृक्षसंबंधी म्हणजेच 'वाक्ष्रदुर्ग' म्हणतात.

५. नृदुर्ग - गज,अश्व,रथ आणि पत्री या चतुरंग सैन्याने रक्षण केलेल्या दुर्गास 'नृदुर्ग' असे म्हणतात.

६. गिरिदुर्ग - आसपास वर चढण्यास संकुचित मार्ग असणारा,नदी, झरे इत्यादिकांच्या जलानी व्यापलेला व धान्य निर्माण होण्यासारख्या क्षेत्रांनी युक्त असलेल्या डोंगरी गड हा 'गिरिदुर्ग' या सज्ञेस प्राप्त होतो.



गिरिदुर्गांचे आठ प्रकार
तंजावर च्या सरस्वती महल ग्रंथालयात अपूर्ण अवस्थेत असणार्या आकाशभैरवकल्प पोथी मध्ये पटल क्रमांक २१ ते २७ मध्ये अष्टविध गिरी दुर्गांची माहिती दिली आहे. डॉ.गोडे यांनी या ग्रंथा बाबत तपशीलवार माहिती प्रसिध्द केलि आहे. सुई सारख्या निमुलत्या आकाराचा, माणसाच्या आकाराचा,सुपाच्या आकाराचा,मध्ये तुटलेला,वाकडा तिकड़ा,नांगरा सारखा असे किल्ले राजाला राहण्यास योग्य नाहित. याच ग्रंथात भद्र,अतिभाद्र,चन्द्र,अर्ध-चन्द्र,नाभ,सुनाभ,रुचिर,वर्धमान असे डोंगरी किल्ल्यांचे आठ उप प्रकार सांगितले आहेत.

१) भद्र गिरिदुर्ग: म्हणजे जो वर्तुळाकृति स्निग्ध आणि पर्वताच्या उंच पण सपाट पठारी शिखरावर आहे.तेथे पानिहि भरपूर आहे.आशा ठिकाणी राजा हत्तीवर बसून ध्वज पताका घेउन वर जाऊ शकतो.
२) अतिभद्र गिरिदुर्ग म्हणजे ज्या डोंगराचे टोक खुप ऊंच चौकोनी,विस्तीर्ण व् जल समृद्ध आहे अशा डोंगर शिखरावर बांधलेला किल्ला.
३) चन्द्र गिरिदुर्ग म्हणजे पायथ्या पासून वर चढ़न्याचा मार्ग अवघड आहे,ज्याचे शिखर मोठे पण चंद्राकृति असते व जेथे भरपूर पाणी असते,असा डोंगरी किल्ला
४) अर्ध चन्द्रगिरिदुर्ग म्हणजे ज्याचा पायथा व शिखर अर्धचंद्राकृति आहेत.जो मध्यम उंचीचा पण उत्तम पाण्याचा भरपूर साठा आहे,असा डोंगरी किल्ला.
५) नाभ गिरिदुर्ग म्हणजे कमळाच्या फुलासारखा विकसित झालेला ज्याचा आकार आहे.
६) सुनाभ गिरिदुर्ग हा पायथ्याशी पुरेसा रुंद व् वर क्रमाक्रमाने निमुलता होत गेलेला डोंगरी किल्ला 
७) रुचिर गिरिदुर्ग पायथ्यपासून वरपर्यंत लहान मोठ्या पायऱ्या बांधलेल्या आहेत.
८) वर्धमान गिरिदुर्ग वैशिष्ट म्हणजे तो अर्दालाकार डोंगरावर वसविला आहे. 
आज मितिस अशा सर्व प्रकारचे किल्ले अचुकपणे दाखविता येत नाहित. 
(संदर्भ :अथातो दुर्गजिज्ञासा- प्र.के.घाणेकर)

गिरिदुर्गांचे वास्तुशास्त्र 
गिरिदुर्गान्वर मराठ्यांची मदार होती. या गिरिदुर्गांच्या संदर्भात शिवकालात एक स्वतन्त्र शास्त्रच निर्माण झाले होते. रामचंद्र पन्त अमात्यानी आपल्या आदन्यापत्रात “गडाची रचना” या शिर्षकाखाली शिवकालीन दुर्ग शास्त्राची विस्ताराने चर्चा केली आहे. गिरिदुर्गाची उभारणी करताना योग्य स्थळ कसे निवडावे, जवळ पास दुसरया उंच टेकड्या असल्यास त्यांच्या भोवती तट बांधून त्यांचे किल्ल्यात कसे रूपान्तर करावे, मुख्य दुर्गाची चढ़न कशा प्रकारची असावी याविषयी अमात्यानी आदन्यापत्रात सूचना दिल्या आहेत.
किल्ल्याला एकापेक्षा अधिक दरवाजे असावेत असा अमात्यांचा आग्रह आहे. ‘किल्ल्यास एक दरवाजा थोर ‘अयब’ आहे. याकरिता गड पाहून, एक दोन वा तीन दरवाजे, तशाच चोर दिंड्या करुन ठेवाव्यात. किल्ल्याचा दरवाजा बांधताना तो कसा असावा याविषयी अमात्य लिहितात, “दरवाजे बांधावे, ते खालील मारा चुकवून पुढे बुरुज देऊन, येती जाती मार्ग बुरुजाचे आहारी पाड़ोंन दरवाजे बांधावे.” तोफखान्यांचा वापर सुरु झाल्यानंतर किल्ल्यासमोरील मैदानातून किंवा समोरील टेकडीवरुन दिसणार नाही असे दरवाजे बांधन्याची गरज निर्माण झाली .रायगडचा महादरवाजा या दृष्टीने महत्वपूर्ण मानला पाहिजे. दरवाज्याचा बुरुज अधिक पुढे करुन येणार्या मार्गांचे नियंत्रण करण्याची तरतूद शिवकालातिल अनेक दुर्गाना केलेली सापडून येते .
गड़ावरील झाडी हर्प्रकारे राखावी अशी अमात्यांची सूचना आहे.या झाड़ीचा प्रसंगी पड्कोट प्रमाने उपयोग होतो. “गडावर राज मंदिराखेरिज मोठी इमारत असता कामा नए. धान्यग्रुहे (अम्बरखाना) उंदीर ,कीड़ा, मुंगी वालवी यांचा उपद्रव बाधणार नाही आशा पद्धतीने बांधावित, दारुची कोठारे मुख्य इमारतिपेक्षा किंवा वसतिपेक्षा दूर अंतरावर योग्य त्या स्थळी बांधावित , गडाच्या खाली दगडाचे कुसु किंवा कुम्पन असलेली इमारत असता कामा नए” आशा अनेक उपयुक्त सूचना अमत्यानी केल्या आहेत. सर्वात महत्वाची सूचना म्हणजे पाण्याच्या सोयिविशयी. “गडांवर आधी उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधने क्रमप्राप्त झाले, तरी आधी खड़क फोडून तली, टाकी , पर्ज्यन्यकालापर्यंत सम्पूर्ण गडास पाणी पुरे, अशी मजबूत बांधावी . गडाची पाणी बहुत जतन करावे







* * चला माहिती करून घेऊया गडकोटांबद्दल * *
भाग 2 

इ.स. सहाव्या शतकात लिहिलेल्या बृहतसंहितेत 'दुक्राग्रलम' म्हणजेच 'जिवंत पाण्याच्या झऱ्याचे संशोधन' या विषयावर दिलेल्या तपशिलावरून या बाबतीत कसे शोध,किती व कशी कशी प्रगती केली,याविषयीचे चित्र पहावयास मिळते.याप्रकारनावर नंतर १२०० वर्षात बर्याच टीका लिहिल्या गेल्या.त्यात थोड्या अधिक तपशिलाची भर पडली असली तरी बृहतसंहितेत असलेली मुलतत्वे अनुभवाने पटल्याची ग्वाही दिली आहे.या प्रकरणाच्या १२५ श्लोकात वृक्षांच्या वाढीवरून,कीटकांच्या अस्तीतवावरून,जमिनीच्या किंवा खडकाच्या रंगरूपावरून अथवा गुणधर्मावरून पाणी शोधण्याचा मार्ग सांगितला आहे.पाण्याचा हा शोध गिरीदुर्गांसाठी फारच उपयोगी ठरला.मुळातले दुर्गम गिरिदुर्ग पाण्याच्या सोयीमुळे अजूनच दुर्गम झाले.याचे एक उदाहरण म्हणजे सिंहगड.येथे सुमारे तीन लाख पर्यटक दरवर्षी येतात.बहुतेक सर्व देवटाक्याचे पाणी पितात.एवढा प्रचंड उपसा असूनही आजही हे देव टाक्या कोरडे पडलेल्या नाहीत.
याउलट कर्नाल्याचे उदाहरण देता येते.कर्नाळा किल्ल्यावर डोंगरात एक खोदीव टाकी आहे.त्यात पाण्यावर हवेचा दाब पडणार नाही,अशी त्या टाकीची पातळी ठेवली होती.पण एकदा टाकीच्या बाहेरील भिंतीवर वीज पडून त्यात पोकळी निर्माण झाल्याने बारमाही,सतत तुडुंब भरून राहणारे टाके पूर्णतः कोरडे पडले.पाण्याच्या झऱ्यांच्या अस्तित्वाचे तत्व सांगताना वराह मिहीर लिहितो'डोंगर,दरया,जमीन,वा दगड असो,सर्वत्र कमी अधिक झरे वाहणाऱ्या शिरा पृथ्वीत असू शकतात आणि त्या जाणण्याची साधने,निसर्गातील उत्पत्ती,स्थिती आणि लायातच दृष्टिगोचर करून घेता येतात.

अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांच्या शाम्तेबद्दल,दूरदृष्टीबद्दल,वास्तुशास्त्र,वास्तुरचना याबद्दल एका वेगळ्या अंगाने आजच्या युगात याबद्दलचे संशोधन होणे गरजेचेवाटते.

जेम्स डग्लस नावाच्या इंग्रजाने 'तोरणा'किल्ल्याबद्दल म्हंटले आहे,'सिंहगड हि सिंहाची गुहा असेल,तर तोरणा हे गरुडाचे घरटे आहे.'अशा प्रकारे गडकोट किल्ल्याबद्दल आपली मते प्रदर्शित केली आहे.

मुल्ला नस्त्रती नावाच्या विजापुरी कवीने 'तोरणा'किल्ल्याबद्दल लिहिले आहे,'शिवाजी राजांचाच एक अवघड गड होता,उंचीने तो आकाशापेक्षा श्रेष्ठ होता.दूरस्थ पाहणार्याला त्याची विशालता पाहून असे वाटे कि,पृथ्वी डोक्यावर घेऊन जणू आकाश उभे आहे.वसंत ॠतू गडावर नुसता मुसमुसत असतो.असे वाटते कि हवेत दुसरेच जग वसलेले आहे.गडावरील प्रत्येक गल्लीत पाण्याचा उत्तम प्रकारचा कालवा वाहत आहे.प्रत्येक ठिकाणी मिस्त्र-इजिप्त सारखी संपन्नता आहे.प्रत्येक ठिकाणी नील नदीचा प्रवाह वाहत आहे.स्वर्गातून इंद्र उतरून अधूनमधून याच गडावर राहून आपली सुख कालक्रमणा करीत असावा.'

अशा प्रकारचे दुर्गवैभव हे महाराष्ट्रात विपुल प्रमाणात आहे व त्याची वैशिष्टे पाहिलीच पाहिजेत.साल्हेरच्या शैलकडा आणि खडकात कोरलेल्या जिन्यांच्या वाटा,देवगिरीच्या खंदक आणि अंधारी,अलंगची टाकी,धोडपची फोडलेली माची,हष्रची दगडांत कोरलेली वाट,अंकाई ची लेणी,हडसरचे दगडात कोरलेले दरवाजे,शिवनेरीचे सात दरवाजे,राजगडच्या माच्या व बालेकिल्ला.रायगडचे टकमक टोक,जंजीरयाचा अभेद्य बुरुज,विजयदुर्गची तिहेरी तटबंदी,लोहगडचा गेट-वे म्हणजे द्वारमंडळ आणि खंदक,परंड्याच्या तोफा,औशातील जमिनीखालच्या विहीर,पन्हाळ्यावरील कोठारे,कंधारची जीभी अशी अनेक किल्ल्यावरची वेगळी वैशिष्टे अभ्यासून पहावीत.
दुर्ग दुर्गम करावयाचे अनेक प्रकार पाहण्यात येतात. दगड वापरून दुर्ग बळकट करतातच,पण दगड काढून नह्वे; तर दगड अदृश्य करूनसुद्धा दुर्ग अभेद्य केल्याची उदाहरणे आहेत.

राजगडचे उदाहरण द्यायचे झाले,तर राजगडच्या तीन माच्या आणि अभेद्य बालेकिल्ल्याला लागलेला एकून दगड अंदाजे २० दशलक्ष टन आहे.एवढा दगड कोठून आणला,त्याच्या खुणाही तेथे नाहीत.दगडाची खाणही जवळ आढळत नाही.पाण्याच्या टाक्यातून जर दगड काढला असे म्हणावे, तर तेथून काढलेला एकून दगड अंदाजे ३ लक्ष टन एवढाच भरेल,मग उरलेला १७ लक्ष टन दगड कोठून आणला असेल?प्रश्न अनुत्तरीतच राहतो.

दुसरे उदाहरण आहे दगड काढू टाकून दुर्ग बळकट करण्याचे.खर तर हे थोड चमत्कारिकच वाटते;पण याचे उत्तम उदाहरण म्हणजे देवगिरी.येथे दगड काढून टाकून दुर्ग बळकट केल्याचे आढळून येते.संभाजीनगर जवळ देवगिरीचा ह डोंगर आहे.किमान अंदाजे ८० लाख टन दगड डोंगरातून काढून टाकलेला आहे.खंदकाच्या तळापासून वरपर्यंत छिन्नी लावलेली उंची ५० मीटर तरी नक्कीच आहे.ऐन खंदक हि १०ते१२ मीटर खोल आहेत.या खंदकातून वर गेल्यावर पुन्हा दगड काढून एक चक्राकार वाट केलेली आहे.या वाटेला 'अंधारी'असे म्हणतात.देवगिरी दुर्गच्या खोदकामाला राष्ट्रकुंतानि सुरवात केली असावी.वेरुळच्या लेण्यांच्या खोदकामाच्या वेळेस हे खोदकाम झाले असावे.'अंधारी'चे प्रवेशद्वार त्याला साक्ष आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात दगड काढून दुर्ग अभेद्य केल्याचे हे एक अपूर्व उदाहरण आहे.

तिसरे उदाहरण म्हणजे दगड अदृश्य केल्याचे आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तरेला वाघोटन नदीच्या मुखाशी 'विजयदुर्ग' हा किल्ला आहे.तीन बाजूला पाणी आणि एका बाजूला खुश्की असे त्याचे स्वरूप आहे.एका ठिकाणी तीन,तर एका ठिकाणी चार तटबंद्या बांधून दुर्ग बळकट केला आहे.

१९९१ मध्ये गोव्याची 'नॅशनल इंस्तिट्यूट ऑफ अशिनाग्राफी' आणि 'वेस्टर्न नेव्हल कमांड' यांनी एक संयुक्त मोहीम राबवली होती.पाणबुडे पाण्यात उतरवून त्यांनी अभ्यास केला.तेथे १२२ मीटर लांब व ७ मीटर रुंद आणि ३ ते ४ मीटर उंच अशी भिंत आढळून आली.प्रचंड आकाराच्या शिळांचा वापर तेथे त्या भिंतीसाठी केल्याचे आढळले.हि भिंत वरून दिसत नाही.म्हणजेच दगड अदृश्य आहे.१७२० च्या आसपास काही इंग्रजी जहाजे या भिंतीला आदळून फुटली.गोव्याच्या पोर्तुगीजांना इथे समुद्रात काहीतरी बांधकाम आहे याची कल्पना होती.दुर्ग अभेद्य करण्याचे हे अजोड उदाहरण आहे;पण ते अदृश्य आहे,अशी अनेक वैशिष्टे आपल्याला दुर्गकोटांच्या बाबत आढळून येतील.

या व अशा अनेक गोष्टींचा आपापल्या परीने वेगवेगळ्या इतिहास संशोधकांनी अभ्यास केला आहे.अनेक वैशिष्टे निदर्शनास आणून दिलेली आहेत.मात्र,यांची सांगड विज्ञान युगात घालणे महत्वाचे वाटते.
इतिहासकारांनी हि दुर्गांसंबंधी अभ्यास केला आहे.त्यासंबंधी सापडलेले अनेक दाखले अभ्यासलेले आहेत.दुर्ग्कोत बांधताना त्यांची वैशिष्टे काय,कोट बळकट करताना घेतलेली काळजी व रचना,नैसर्गिक वैशिष्टे,यासबंधी अनेक संशोधकांनी आपली मते वेगवेगळ्या स्वरुपात मांडलेली आहेत.




No comments:

Post a Comment