Wednesday, 20 June 2012

पुणेकरांचा आवडता सिंहगड . . . .




पुण्यानजीक असणारा आणि पुणेकरांचा आवडता सिंहगड प्राचीन दुर्ग आहे.इसवी सन १३५० मध्ये इसामीने लिहिलेल्या 'शाहनामा-ए-हिंद' अथवा 'फुतूह स्सलातीन' या ग्रंथात 'कुंधीयाना' म्हणून या दुर्गाचा उल्लेख आला आहे.इसवी सन १३२८ मध्ये मुहम्मद तुघलकाने एका कोळ्याकडून हा दुर्ग जिंकल्याचा उल्लेख त्या ग्रंथात आहे.पुरंदरच्या तहाच्या वेळेस शिवाजीमहाराजांनी जे २३ दुर्ग मुघलांना दिले,त्यात सिंहगड होता.पुढे तानाजी मालुसरे यांनी किल्ला घेण्यासाठी आपला बळी स्वराज्याच्या वेदीवर चढवला.त्यावेळेस राजे म्हणाले,'एक गड आला;पण माझा सिंह गेला'.

पुढे औरंगजेबाने हा दुर्ग जिंकल्यावर त्याचे नाव ठेवले 'बक्षिंदाबक्ष' म्हणजे बक्षीस देणारा जो त्याने दिलेले बक्षीस.इंग्रजांनी इसवी सन १८१८ मध्ये हा काबीज केला तेंव्हा त्याची सहा महिने लुट चालली होती.उन्हाळ्यात गडाची हवा उत्तम असल्याने तेथे राहण्यासाठी म्हणून इंग्रजांनी जवळजवळ ७० बंगले बांधल्याची एक जुनी नोंद आहे.

गडाला पुण्याकडील वाटेवर तीन दरवाजे आहेत,तर कल्याण गावाकडील वाटेवर दोन दरवाजे आहेत.पूर्वीचे टाके;पण इंग्रजी काळातील पागा,वाड्याची जोती,अमृतेश्वर आणि कोंढानेश्वराची मंदिरे,राजाराममहाराजांची आणि तानाजी मालुसरे यांच्या समाध्या अशा अनेक वस्तू पाहण्यासारख्या आहेत.

गडावर पाण्याच्या अनेक टाक्या आहेत.वनखात्याच्या नोंदीनुसार गडावर साडेतीनशे पाण्याच्या टाकी आहेत.एका टाकीबद्दल सांगायचे झाले तर,या टाकीचे नाव आहे.'देवटाके' देवटाके वरून लहान पण आत बरेच पसरत गेलेले आहे.सध्या सिंहगडावर पर्यटकांची वर्दळ वाढलेली आहे.सुमारे ४ लाख च्यावर पर्यटक दरवर्षी सिंहगडावर येतात.हे सर्व पर्यटक आणि गडावरची माणसे देवटाकीचे पाणी पिण्यास वापरतात.देवटाके सर्वांची तहान भागवते.आजवर ते कोरडे पडल्याची माहिती नाही.
देवटाकीचे पाण्याचे स्त्रोत आतून कसे आहेत,हे सांगणे अवघड आहे.एकाने पाच दहा खांबापुढे पोहत गेल्यावर पुढे अंधार असल्याने परत आल्याचे सांगितले आहे.डोंगराच्या पोटात कोठेतरी नक्की पाण्याचा प्रचंड साठा असल्याचे दिसते.पाण्याच्या साठ्याची हि जागा कोणी शोधली असावी?

सिंधुदुर्ग टोपकरांच्या ऊरावर ....



सिंधुदुर्ग म्हणजे अठरा टोपकरांच्या ऊरावर शिवप्रभूनी उभारलेला एक बळकट जलदुर्ग आहे.मालवण नजीक असणारे कुरटे नावाचे हे बेट तटबंदी घालून बंदिस्त केले आहे.आरमार पावसाळ्यात वसवण्यासाठी उत्तम बंदराचा आणि जंजिर्याचा आसरा लागतो.गोव्याच्या पोर्तुगीजांनी शह देण्यासाठी या दुर्गाची रचना केली गेली.

सिंधुदुर्गाच प्रवेशद्वार जीभीचे आहे.त्यातून आत आल्यावर उजवीकडे वळून पायर्यांवरून फांजीवर गेल्यास दोन घुमट्या आहेत.तेथील दोन घूमट्यात चुन्यात हातापायांचे ठसे आहेत.ते 'तीर्थरूप कैलासवासीमहाराज राजश्री छत्रपती' यांच्या हातापायांचे आहेत,असे इ.स.१७६२ मध्ये कोल्हापूरच्या जिजाबाई यांनी सिंधुदुर्गचा किल्लेदार येसाजी शिंदे याला पाठवलेल्या पत्रात म्हंटले आहे.
तटबंदीवरून आपल्याला गडाची प्रदक्षिणा पूर्ण करता येते.प्रवेशद्वारातून पुढे गेल्यास डाव्या हाताला एक आगळेवेगळे नारळाचे झाड आहे.त्या झाडाला दोन फांद्या आहेत आणि दोन्ही फांद्यांना नारळ लागले आहेत.तेथून पुढे गेल्यास शिवराजेश्वर मंदिर आहे.हे शिवाजीमहाराजांचे मंदिर त्यांचे पुत्र राजाराम महाराज यांनी बांधलेले आहे.आत शिवाजीमहाराजांची मूर्ती आहे.

दुर्गावर गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहेत.दहिबाव,दुधबाव,साखरबाव अशी त्यांची नवे आहेत.कोल्हापूरच्या छत्रपतीकडे या दुर्गाचा ताबा आहे.काही काळ चाच्यांनी हा दुर्ग ताब्यात घेतला होता.इंग्रजांनी चाच्यांकडून हा दुर्ग जिंकून त्याचे नाव ठेवले 'फोर्ट ऑगस्टस'
सिंधुदुर्गाचे एक मोठे वैशिष्ट्य आहे.त्याच्या तटबंदी चा परीघ ५-६ किलोमीटर तरी आहे.त्या तटबंदी वर जाण्यासाठी ४५ जिने बांधलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तटबंदीतच ४० शौचकुपे आहेत.इतक्या मोठ्या संखेने शौचकुपे असल्याचे इतर दुर्गात आढळत नाही.मळाचा कोणताही त्रास दुर्गात होत नाही.दुर्गाचे क्षेत्रफळ २० हेक्टर असावे.आत सुमारे अडीच-तीन हजार लोक दुर्ग लढवण्यास असताना स्वच्छतेची इतकी उत्कृष्ट व्यवस्था करणाऱ्या त्या स्थापतीचे कौतुक करावयास हवे.

सिंधुदुर्गाची हि रचना अभ्यास करण्यासारखी आहे.सध्या दुर्गाला ४० ठिकाणी भगदाडे पडली आहेत.त्यातून सागराचे पाणी आत येते.इथे समुद्रात डॉल्फिन्स हि आहेत.सिंधुदुर्गाची वैशिष्ट्य पाहण्याची सहल अभ्यासपूर्णठरेल.


पद्मदुर्ग शिवरायांची सागरी दौड . . .




सिद्याच्या जंजिर्याला शह देण्यासाठी शिवप्रभूनी पद्मदुर्गाची उभारणी केली.जंजिर्याचा दुर्ग इ. सन १५६७ ते १५७२ या दरम्यान बांधला गेला.आधी निजामशाही आणि नंतर मुघल यांच्या आधीन असणारया सिद्द्यानी या बळकट,कुबल दुर्गाच अजिंक्यत्व कायम राखल.मराठ्यांनी वारंवार हल्ले चढवूनही त्यांना जंजिरा घेता आला नाही.
जझीरा म्हणजे बेट.'जंजिरा' हा त्याचा मराठी अपभ्रंश पाण्यातील बेटावरील दुर्गासाठी वापरला जातो.जंजिर्याचे नाव आहे 'माहरुबा'. माह म्हणजे चंद्र आणि रुबा म्हणजे चतकोर! मुरुड जवळच्या बेटावरील हा दुर्ग एकवीस बुरुजांनी बंदिस्त केला आहे.काही बुरुज प्रचंड आहेत.या बुरुजांवरच्या अनेक मोठ्या तोफांनी जंजीरयाच अभेद्यत्व कायम ठेवलं होत.शिवाजीमहाराजांनी कोकणपट्टीवरील अनेक दुर्ग ताब्यात आणून आणि स्वराज्याच आरमार तयार करून सिद्याच्या कोकणातील अत्याचारांना मोठाच आळा घातला होता;पण जंजिरा आपल्या ताब्यात आणण्यास मात्र त्यांना यश आल नाही.

शेवटी जंजीरयावर दबाव रहावा म्हणून त्याच्यापासून दूर समुद्रात असणारया एका छोट्या बेटावर शिवप्रभूनी एक दुर्ग बांधावयास काढला.मुरूडच्या किनार्यावरून हे बेट दिसते.त्याचे नाव आहे कांसा.या कांसा बेटावर मराठी स्थपती दुर्ग उभारणीच काम करू लागले.सिद्दी या बेटावर हल्ले चढवतील म्हणून दर्यासारंग आणि दौलतखान यांना आरमार घेऊन बेटाच्या मदतीला पाठविण्यात आले.शिवप्रभूनी हा दुर्ग बांधला.
पुढे हा सिद्द्यानी जिंकून घेतला.त्या पद्म्दुर्गाचा मूळचा काही भाग पडून सिद्द्यानी त्यावर त्यांच्या शैलीतील बांधकाम केले.मराठी आणि सिद्दी यांच्या बांधकाम शैलीतील फरक पद्म्दुर्गावर लगेचच कळून येतो. पद्मदुर्गाचे मग वैशिष्ट्य काय आहे?

जंजिरा आणि पद्मदुर्गावर एक गंमत पहावयास मिळते.येथे दगड चुन्यात बसवले आहेत आणि चुन्याचे थरही जाड आहेत. या दोन्ही दुर्गांवर एक गोष्ट पहावयास मिळते ती म्हणजे सागराच्या लाटांच्या मारामुळे बरयाच ठिकाणी तटबुरुजांचे दगड झिजले आहेत.झिजून वीत दोन विती आत गेले आहेत;पण त्यांना जखडून ठेवणारे चुन्याचे ठार मात्र तसेच आहेत.ते काही झिजलेले दिसत नाहीत.पूर्वी चुना उत्तमरीत्या मळून,तो ठराविक वेळातच वापरात असत.त्यामुळे चुन्याचे पकडीचे गुण वाढत असत.चुण्यावर हवामानाचा आणि लाटांचा मोठा परिणाम झालेला दिसत नाही.आज चार-पाचशे वर्षे तरी चुना तसाच टिकूनआहे.


खांदेरी बेटालाच बांधलेली तटबंदी ...






खांदेरीचा दुर्ग हा काही फार प्रसिद्ध दुर्ग नाह्वे;पण हे बेट मुंबईच्या समोरच असल्याने अतिशय मोक्याचे आहे.इ.स.१६७९ च्या ऑगस्ट महिन्यात शिवाजीमहाराजांनी मायनाक भंडार्याला येथे पाठवून बेटावर किल्ला बांधावयास काढला.या बेटावर वेताळाचे एक मोठे राऊळ आहे.त्याची पूजा केल्याशिवाय कोणीही कोळी नावा मासेमारीसाठी समुद्रात घालत नाहीत.बेटावर एक टेकडी आहे आणि बेटालाच तटबंदी घातली आहे.
मायनाक भंडारी तटबंदी बांधत असताना मुंबईच्या इंग्रजांनी ती थांबवण्याचे आटोकाट प्रयत्न केले.कॅप्टन विलियम मिन्चीन,रिचर्ड केग्वीन,जॉन ब्रान्डबरी,फ्रान्सिस थोर्प असे नामांकित सागरी सेनानी खांदेरीवर पाठवून ते बेट मराठ्यांकडून काबीज करण्याचे मोठे प्रयत्न इंग्रजांनी केले.रिव्हेंज आणि हंटर नावाच्या दोन फ्रींगेटेस त्यांनी पाठवल्या होत्या.गेप नावाच्या माणसाकडून काही गुराबा भाड्याने घेऊन त्यावर कशातरी काही तोफा बांधून त्यांनी इंग्रजी आरमार पाठवण्याचा प्रयत्न केला.

मायनाक भंडार्याच्या मदतीला नंतर दौलातखानाचे आरमार आले.आलिबाग-थळच्या किनार्यालगत असलेल्या या आरमाराने इंग्रजी आरमारातल्या त्रुटी हेरल्या!मराठ्यांच्या होड्या थळच्या किनार्यावरून सामानसुमान घेऊन खांदेरी बेटावर निघत.त्यांना प्रतिबंध करण्यासाठी किनारा आणि बेट यामध्ये एक 'ब्लोकेड' उभारण्याचे इंग्रजांनी ठरवले होते;पण त्यांच्या मोठ्या जहाजांना या चेनेलमध्ये ठिय्या देऊन राहण्याचे काम जमले नाही.वाऱ्यामुळे त्यांच्या होड्या किनार्याकडे फेकल्या जात आणि त्या दगडांवर आपटून फुटण्याची भीती असल्याने इंग्रजांना ती जहाजे खोल पाण्यात न्यावी लागली.छोट्या गुराबा त्यांनी आणल्या असता 'डव्ह'नावाच्या त्यांच्या गुराबेवर पाठीमागे तोफ नसल्याने ती त्रुटी हेरून शिवप्रभूंच्या आरमाराने पाठीमागून चक्राकार हल्ला चढवून ती गुराब पकडली आणि त्यावरच्या इंग्रजांना सागरगडावर कैदेत डांबले.

सागराची भरती-ओहोटी,खोल-उथळ पाणी,मतलय,वैगेरेचे ज्ञान मराठ्यांना इंग्रजांपेक्षा जास्त असल्याचे दिसले.मराठ्यांच्या संगमेश्वरी नावाच्या वेगळ्या आराखड्याच्या होड्यांनी या युद्धात कमाल केली.या चिंचोळ्या होड्या रात्री वल्व्ह्त मराठे सामान बेटावर पोहचते करीत.इंग्रजी जहाजे पूर्णपणे वार्यावर अवलंबून असत.खास मराठी बांधणीच्या या होड्यांनी इंग्रजांना आश्चर्यकारकरित्या चकवले.
कॅप्टन विलियमने मुंबईला पाठवलेल्या पत्रात म्हंटले आहे,'या सरपठनार्या मराठी होड्या रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन आम्हाला आश्चर्यकारकरित्या चकवतात.अशा होड्या इंग्रजी आरमारात हव्यात!' काय गमत आहे बघा!खास मराठी बांधणीच्या होड्या त्या दर्यावादी इंग्रजांना हव्याहोत्या!

अर्नाळा शनिवारवाड्याची प्रतिकृती ..




वैतरणा नदी जेथे सागराला मिळते तेथे एका वेगळ्या बेटावर एका दुर्गाची बांधणी करण्यात आली आहे.या दुर्गाचे नाव आहे अर्नाळा! ज्या बेटावर हा दुर्ग वसला आहे त्या बेटाचे नावच दुर्गाला देण्यात आले आहे.सिंधुदुर्ग आणि अर्नाळा हे दोन्ही दुर्ग बेटांवर असले तरी त्यांच्या रचनेत मोठा फरक आहे.सिंधुदुर्ग हा संपूर्ण बेत व्यापून राहिला आहे,तर अर्नाळा बेटावरच्या काही भागात बांधला आहे.अर्नाळासंबंधी म्हंटले आहे कि 'त्यास विचार पाहता आर्नालीयासारखी जागा दुसरे कोठे नाही.चहूकडील आरमारास मार्ग,खाडी मनोरे-मांडवीपोवतो गेली आहे.ते स्थल जालिया,दुसरा जंजिरा,फिरंगानदेखील हस्तगत होते.'

उत्तर फिरंगानात अर्नाळ्याचा दुर्ग बाजीराव पेशव्यांनी बांधला.बेटावर प्रत्येक बाब किनार्यावरून आणावी लागे.तीनचारशे लोक याच कामास लागले होते.एके ठिकाणी नोंद आहे-'बुरुज तीन. बहिरव,भवानी,बाबा यैसे तीन बुरुज जमिनीपासून उंच.बाबा बुरुज काम दोन गज जाले.दोनही बुरुज पायापासून नव हात जमिनीबरोबर काम आहे....!'

असा अर्नाळा दुर्ग उभा राहिला.अर्नाळा हि पुण्याच्या शनिवारवाड्याची प्रतिकृती आहे.शनिवारवाडा हा नऊबुरुजी कोट आहे,तर अर्नाळा दहाबुरुजी आहे.अर्नाल्याचे प्रवेशद्वार देखणे आहे.द्वारावर चांगली सूचक द्वारशिल्पे आहेत.दरवाजावरच बाजीराव पेशव्यांच्या नावाचा एक शिलालेख आहे.२३ मे १७३७ रोजी या कोटाचे काम पूर्ण झाल्याचा त्यात उल्लेख आहे.

अर्नाल्याच्या तटाची उंची १० मीटर आहे.तटाची रुंदी तीन मीटर आहे.आत दत्तमंदिर आहे.

एका पोर्तुगीजाने लिहिले आहे-'मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून वसई प्रांत जिंकून घेतल्यावर लगेच वसई व अर्नाळा येथे आपले आरमार उभारले व विजयदुर्ग ताब्यात घेतल्यापासून तीन ठिकाणी मराठ्यांचे आरमारी तळ झाले आहेत.'

अर्नाळ्याचा हा कोट पूर्ण बेटावर बांधला नसल्याने बेटावर शत्रू उतरून कोटाकडे येण्याची शक्यता होती.या बेटावर त्यासाठी टेहालनिसाठी आणि क्वचित तोफांचा मारा करण्यासाठी एकांडा टेहालणी बुरुज बांधलेला आहे.युरोपच्या किनारपट्टीवर असे प्रचंड बुरुज आढळतात.अशा बांधकामाला तिकडे 'मोर्ट्रेलो टोवर' म्हणतात.असे एक आगळेवेगळे बांधकाम अर्नाळा बेटावर आहे.ते अभ्यासण्यासारखेआहे.


चाकणचा संग्रामदुर्ग ...रणमंडळाचे चक्रव्यूव्ह

                         


काही वर्षानंतर 'इथे एक किल्ला होता' असे सांगावे लागेल,अशी चाकणच्या संग्रामदुर्गाची स्थिती आहे.
आपण किल्ल्यात कधी येतो आणि कधी बाहेर पडतो हे कळेनासे झाले आहे.असे का झाले? आपला इतिहास जतन करावयाच्या जाणीवा बोथट झाल्या आहेत का? आक्रमकांविरुद्ध ज्या दुर्गानीच आपले स्वातंत्र्य आणि अस्मिता जिवंत ठेवली;त्या महाराष्ट्रातील दुर्गांची सद्यस्थिती पाहून यातना होतात.इतिहास जतन करण्याकडे लक्षच नाही.ते असते तर दुर्गांची अशी दारूण अवस्था झालीच नसती.
शिवशाहीतील एका पराक्रमाचा साक्षीदार हा चाकणचा दुर्ग आहे.बादशाह औरंगजेबाचा मामा अमीर उल उमरा शायीस्ताखान हा मोठ्ठ्या फौजेनिशी स्वराज्यात आला.या भुईकोट दुर्गाला त्याने वेढा घातला.संग्रामदुर्गात फिरंगोजी नरसाळा नावाचा किल्लेदार होता.त्याने किल्ला लढवण्याची पूर्ण तयारी केली होती.संग्रामदुर्ग म्हणजे काही नामांकित दुर्ग नव्हे.आधीच तो स्थलदुर्ग;पण खांद्काने वेढलेला.त्यामुळे थोडी बळकटी आलेला.खडकात पाणीही होते,शिवाय दिवस पावसाचे होते. २१ जून १६६० रोजी किल्ल्याला मुघलांचा वेढा पडला. हा वेढा तब्बल ५६ दिवस चालला.

तोफा बंदुकांचा काही उपयोग होत नाही, हे पाहिल्यावर शायीस्ताखानाने भुयार खणून सुरुंग ठासण्याची आज्ञा केली.ताबडतोब कामाला सुरवात झाली.हे भुयार खंदकाखालून खणण्यात येत होते.
आतल्या मराठ्यांना जर या भुयाराची कल्पना आली असती,तर कदाचित खंदकातील पाणी त्यात सोडून सुरुंग नाकाम करता आले असते.३००-३५० लोकांनीशी फिरंगोजी नरसाळ्याने चाकण झुंजवत ठेवला होता. १४ ऑगस्ट १६६० हा दिवस उगवला. मुघलांनी सुरुन्गाला बत्ती दिली.
पूर्वेच्या कोपरयाचा बुरुज अस्मानात उडाला.त्यावरचे मराठेही हवेत उडाले.आरोळ्या ठोकत मुघल त्या खिंडाराकडे धावले.फिरांगोजीनीही वाट न पाहता ते खिंडार लढवण्याची तयारी केली.तो पूर्ण दिवस मराठ्यांनी जोमाने लढाई केली.दुसर्या दिवशी राव भावसिन्हामार्फत मराठे किल्ल्याबाहेर आले आणि मुघलांनी चाकणचा संग्रामदुर्ग जिंकला

या दुर्गात एक आश्चर्यकारक रचना आहे.झाड-झाडोरा वाढल्यामुळे हि योजना नित पाहता येत नाही. पूर्वेच्या बाजूला आत आल्यानंतर उजव्या बाजूला एक मोठे प्रवेशद्वार लागते. तीच वाट आहे असे समजून कोणी चालू लागला कि, वाट हळू हळू निरुंद होत जाते आणि सरतेशेवटी बंद होते. तटावरच्या लोकांना आत आलेला शत्रू अलगद मारयात सापडतो.
अशा रचनेला 'रणमंडळ' म्हणतात.ते चाकणच्या संग्रामदुर्गात आहे.

महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती



* * चला माहिती करून घेऊया गडकोटांबद्दल * *
भाग 1



महाराष्ट्रात गडकोट वैभव गिरी-दुर्गांच्या पहाऱ्यातून विपुल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग असे सांगत साल्हेर अहिवंतापासून जिंजी तंजावरपर्यंत दुर्गाची एक प्रचंड शृंखला उभारून स्वराज्य सुरक्षित करून ठेवले.दुर्गमता हा गडाचा गाभा होता. शत्रूकडे असलेल्या हत्याराच्या ताकदीवर दुर्गाची रचना अवलंबून असे.प्राचीन काळी वस्तीभोवती काटेरी झाडे टाकून वस्तीचे रक्षण करण्यात येई. नंतर लाकडाचे परकोट उभारण्यात येऊ लागले. मग दगडाची रचाई झाली.शेवटी दगड तासून पक्की तटबंदी उभारण्यापर्यंत मजल गेली.अशी तटबंदी असलेल्या ग्रामांना 'पूर' म्हणत असत.तरीही शत्रू बलाढ्य असेल, तर या तटबंदीयुक्त पुराचा पराभव अटळ असे. अशा वेळी गिरी-दुर्गाची रचना करण्यात आली. मात्र, असे गिरी दुर्ग बाधण्याचा खर्च अपरमित असे, परंतु संरक्षण या एकमेव कारणासाठी तो खर्च करणे अपरिहार्य असे. भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊन,त्याची दुर्गमता अभ्यासून अशा ठिकाणी दुर्गाची निर्मिती केल्यामुळे किंवा दुर्ग उभारल्यामुळे शत्रूपासून संरक्षण मिळत असे.मात्र, हेच गडकोट अधिकाधिक बलाढ्य करण्यात मनुष्याचे बुद्धीचातुर्य पणाला लागले. त्यातील बारकाव्यांचा अभ्यास केला गेला व त्यातूनच बेलाग दुर्ग उभारले गेले. परिस्थितीशी सांगड घालून अधिकाधिक दुर्गम ठिकाणी गडकोटांची उभारणी केली गेली. वास्तुरचना, स्थापत्यशास्त्र यांचा कस पणाला लाऊन अशा गडकोटांची निर्मिती झाली.आपल्याकडील अनेक जुन्या ग्रंथांमधून दुर्गांच्या प्रकाराची माहिती मिळते. मनुस्मृतीच्या सातव्या अध्यायात दुर्गांबद्दल केलेली चर्चा आली आहे. त्याचा आशय असा आहे- 

'राजाने दुर्गांच्या जवळ वसवलेल्या नगरातच आपले वास्तव्य ठेवावे.'

असे सहा प्रकारचे दुर्ग आहेत 

१. धनुदुर्ग - ज्याच्या आजूबाजूस वीस कोसपर्यंत पाल नाही, त्यास 'धनदुर्ग' म्हणतात

२. महीदुर्ग - ज्याला बारा हातांपेक्षा अधिक उंच तटबंदी आहे, युद्धाचा जर प्रसंग आलाच तर ज्यावरून व्यवस्थित पहारेकर्यांना फिरता येईल, ज्याला झारोक्यानी युक्त अशा खिडक्या ठेवल्या आहेत, अशा दुर्गास 'महादुर्ग' असे म्हणावे.

३. अब्ददुर्ग किंवा जलदुर्ग - अपरिमित जलाने चोहोबाजूंनी वेढलेल्या दुर्गास 'अब्ददुर्ग' किंवा 'जलदुर्ग' अशी संज्ञा आहे.

४. वाक्ष्रदुर्ग - तटाच्या बाहेर चारी बाजूला चार कोसापर्यंत मोठमोठे वृक्ष,काटेरी झाडे,कळकाची बेटे आणि वेलींच्या जाळ्या यांनी वेष्टीलेल्या दुर्गास वृक्षसंबंधी म्हणजेच 'वाक्ष्रदुर्ग' म्हणतात.

५. नृदुर्ग - गज,अश्व,रथ आणि पत्री या चतुरंग सैन्याने रक्षण केलेल्या दुर्गास 'नृदुर्ग' असे म्हणतात.

६. गिरिदुर्ग - आसपास वर चढण्यास संकुचित मार्ग असणारा,नदी, झरे इत्यादिकांच्या जलानी व्यापलेला व धान्य निर्माण होण्यासारख्या क्षेत्रांनी युक्त असलेल्या डोंगरी गड हा 'गिरिदुर्ग' या सज्ञेस प्राप्त होतो.



गिरिदुर्गांचे आठ प्रकार
तंजावर च्या सरस्वती महल ग्रंथालयात अपूर्ण अवस्थेत असणार्या आकाशभैरवकल्प पोथी मध्ये पटल क्रमांक २१ ते २७ मध्ये अष्टविध गिरी दुर्गांची माहिती दिली आहे. डॉ.गोडे यांनी या ग्रंथा बाबत तपशीलवार माहिती प्रसिध्द केलि आहे. सुई सारख्या निमुलत्या आकाराचा, माणसाच्या आकाराचा,सुपाच्या आकाराचा,मध्ये तुटलेला,वाकडा तिकड़ा,नांगरा सारखा असे किल्ले राजाला राहण्यास योग्य नाहित. याच ग्रंथात भद्र,अतिभाद्र,चन्द्र,अर्ध-चन्द्र,नाभ,सुनाभ,रुचिर,वर्धमान असे डोंगरी किल्ल्यांचे आठ उप प्रकार सांगितले आहेत.

१) भद्र गिरिदुर्ग: म्हणजे जो वर्तुळाकृति स्निग्ध आणि पर्वताच्या उंच पण सपाट पठारी शिखरावर आहे.तेथे पानिहि भरपूर आहे.आशा ठिकाणी राजा हत्तीवर बसून ध्वज पताका घेउन वर जाऊ शकतो.
२) अतिभद्र गिरिदुर्ग म्हणजे ज्या डोंगराचे टोक खुप ऊंच चौकोनी,विस्तीर्ण व् जल समृद्ध आहे अशा डोंगर शिखरावर बांधलेला किल्ला.
३) चन्द्र गिरिदुर्ग म्हणजे पायथ्या पासून वर चढ़न्याचा मार्ग अवघड आहे,ज्याचे शिखर मोठे पण चंद्राकृति असते व जेथे भरपूर पाणी असते,असा डोंगरी किल्ला
४) अर्ध चन्द्रगिरिदुर्ग म्हणजे ज्याचा पायथा व शिखर अर्धचंद्राकृति आहेत.जो मध्यम उंचीचा पण उत्तम पाण्याचा भरपूर साठा आहे,असा डोंगरी किल्ला.
५) नाभ गिरिदुर्ग म्हणजे कमळाच्या फुलासारखा विकसित झालेला ज्याचा आकार आहे.
६) सुनाभ गिरिदुर्ग हा पायथ्याशी पुरेसा रुंद व् वर क्रमाक्रमाने निमुलता होत गेलेला डोंगरी किल्ला 
७) रुचिर गिरिदुर्ग पायथ्यपासून वरपर्यंत लहान मोठ्या पायऱ्या बांधलेल्या आहेत.
८) वर्धमान गिरिदुर्ग वैशिष्ट म्हणजे तो अर्दालाकार डोंगरावर वसविला आहे. 
आज मितिस अशा सर्व प्रकारचे किल्ले अचुकपणे दाखविता येत नाहित. 
(संदर्भ :अथातो दुर्गजिज्ञासा- प्र.के.घाणेकर)

गिरिदुर्गांचे वास्तुशास्त्र 
गिरिदुर्गान्वर मराठ्यांची मदार होती. या गिरिदुर्गांच्या संदर्भात शिवकालात एक स्वतन्त्र शास्त्रच निर्माण झाले होते. रामचंद्र पन्त अमात्यानी आपल्या आदन्यापत्रात “गडाची रचना” या शिर्षकाखाली शिवकालीन दुर्ग शास्त्राची विस्ताराने चर्चा केली आहे. गिरिदुर्गाची उभारणी करताना योग्य स्थळ कसे निवडावे, जवळ पास दुसरया उंच टेकड्या असल्यास त्यांच्या भोवती तट बांधून त्यांचे किल्ल्यात कसे रूपान्तर करावे, मुख्य दुर्गाची चढ़न कशा प्रकारची असावी याविषयी अमात्यानी आदन्यापत्रात सूचना दिल्या आहेत.
किल्ल्याला एकापेक्षा अधिक दरवाजे असावेत असा अमात्यांचा आग्रह आहे. ‘किल्ल्यास एक दरवाजा थोर ‘अयब’ आहे. याकरिता गड पाहून, एक दोन वा तीन दरवाजे, तशाच चोर दिंड्या करुन ठेवाव्यात. किल्ल्याचा दरवाजा बांधताना तो कसा असावा याविषयी अमात्य लिहितात, “दरवाजे बांधावे, ते खालील मारा चुकवून पुढे बुरुज देऊन, येती जाती मार्ग बुरुजाचे आहारी पाड़ोंन दरवाजे बांधावे.” तोफखान्यांचा वापर सुरु झाल्यानंतर किल्ल्यासमोरील मैदानातून किंवा समोरील टेकडीवरुन दिसणार नाही असे दरवाजे बांधन्याची गरज निर्माण झाली .रायगडचा महादरवाजा या दृष्टीने महत्वपूर्ण मानला पाहिजे. दरवाज्याचा बुरुज अधिक पुढे करुन येणार्या मार्गांचे नियंत्रण करण्याची तरतूद शिवकालातिल अनेक दुर्गाना केलेली सापडून येते .
गड़ावरील झाडी हर्प्रकारे राखावी अशी अमात्यांची सूचना आहे.या झाड़ीचा प्रसंगी पड्कोट प्रमाने उपयोग होतो. “गडावर राज मंदिराखेरिज मोठी इमारत असता कामा नए. धान्यग्रुहे (अम्बरखाना) उंदीर ,कीड़ा, मुंगी वालवी यांचा उपद्रव बाधणार नाही आशा पद्धतीने बांधावित, दारुची कोठारे मुख्य इमारतिपेक्षा किंवा वसतिपेक्षा दूर अंतरावर योग्य त्या स्थळी बांधावित , गडाच्या खाली दगडाचे कुसु किंवा कुम्पन असलेली इमारत असता कामा नए” आशा अनेक उपयुक्त सूचना अमत्यानी केल्या आहेत. सर्वात महत्वाची सूचना म्हणजे पाण्याच्या सोयिविशयी. “गडांवर आधी उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधने क्रमप्राप्त झाले, तरी आधी खड़क फोडून तली, टाकी , पर्ज्यन्यकालापर्यंत सम्पूर्ण गडास पाणी पुरे, अशी मजबूत बांधावी . गडाची पाणी बहुत जतन करावे







* * चला माहिती करून घेऊया गडकोटांबद्दल * *
भाग 2 

इ.स. सहाव्या शतकात लिहिलेल्या बृहतसंहितेत 'दुक्राग्रलम' म्हणजेच 'जिवंत पाण्याच्या झऱ्याचे संशोधन' या विषयावर दिलेल्या तपशिलावरून या बाबतीत कसे शोध,किती व कशी कशी प्रगती केली,याविषयीचे चित्र पहावयास मिळते.याप्रकारनावर नंतर १२०० वर्षात बर्याच टीका लिहिल्या गेल्या.त्यात थोड्या अधिक तपशिलाची भर पडली असली तरी बृहतसंहितेत असलेली मुलतत्वे अनुभवाने पटल्याची ग्वाही दिली आहे.या प्रकरणाच्या १२५ श्लोकात वृक्षांच्या वाढीवरून,कीटकांच्या अस्तीतवावरून,जमिनीच्या किंवा खडकाच्या रंगरूपावरून अथवा गुणधर्मावरून पाणी शोधण्याचा मार्ग सांगितला आहे.पाण्याचा हा शोध गिरीदुर्गांसाठी फारच उपयोगी ठरला.मुळातले दुर्गम गिरिदुर्ग पाण्याच्या सोयीमुळे अजूनच दुर्गम झाले.याचे एक उदाहरण म्हणजे सिंहगड.येथे सुमारे तीन लाख पर्यटक दरवर्षी येतात.बहुतेक सर्व देवटाक्याचे पाणी पितात.एवढा प्रचंड उपसा असूनही आजही हे देव टाक्या कोरडे पडलेल्या नाहीत.
याउलट कर्नाल्याचे उदाहरण देता येते.कर्नाळा किल्ल्यावर डोंगरात एक खोदीव टाकी आहे.त्यात पाण्यावर हवेचा दाब पडणार नाही,अशी त्या टाकीची पातळी ठेवली होती.पण एकदा टाकीच्या बाहेरील भिंतीवर वीज पडून त्यात पोकळी निर्माण झाल्याने बारमाही,सतत तुडुंब भरून राहणारे टाके पूर्णतः कोरडे पडले.पाण्याच्या झऱ्यांच्या अस्तित्वाचे तत्व सांगताना वराह मिहीर लिहितो'डोंगर,दरया,जमीन,वा दगड असो,सर्वत्र कमी अधिक झरे वाहणाऱ्या शिरा पृथ्वीत असू शकतात आणि त्या जाणण्याची साधने,निसर्गातील उत्पत्ती,स्थिती आणि लायातच दृष्टिगोचर करून घेता येतात.

अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांच्या शाम्तेबद्दल,दूरदृष्टीबद्दल,वास्तुशास्त्र,वास्तुरचना याबद्दल एका वेगळ्या अंगाने आजच्या युगात याबद्दलचे संशोधन होणे गरजेचेवाटते.

जेम्स डग्लस नावाच्या इंग्रजाने 'तोरणा'किल्ल्याबद्दल म्हंटले आहे,'सिंहगड हि सिंहाची गुहा असेल,तर तोरणा हे गरुडाचे घरटे आहे.'अशा प्रकारे गडकोट किल्ल्याबद्दल आपली मते प्रदर्शित केली आहे.

मुल्ला नस्त्रती नावाच्या विजापुरी कवीने 'तोरणा'किल्ल्याबद्दल लिहिले आहे,'शिवाजी राजांचाच एक अवघड गड होता,उंचीने तो आकाशापेक्षा श्रेष्ठ होता.दूरस्थ पाहणार्याला त्याची विशालता पाहून असे वाटे कि,पृथ्वी डोक्यावर घेऊन जणू आकाश उभे आहे.वसंत ॠतू गडावर नुसता मुसमुसत असतो.असे वाटते कि हवेत दुसरेच जग वसलेले आहे.गडावरील प्रत्येक गल्लीत पाण्याचा उत्तम प्रकारचा कालवा वाहत आहे.प्रत्येक ठिकाणी मिस्त्र-इजिप्त सारखी संपन्नता आहे.प्रत्येक ठिकाणी नील नदीचा प्रवाह वाहत आहे.स्वर्गातून इंद्र उतरून अधूनमधून याच गडावर राहून आपली सुख कालक्रमणा करीत असावा.'

अशा प्रकारचे दुर्गवैभव हे महाराष्ट्रात विपुल प्रमाणात आहे व त्याची वैशिष्टे पाहिलीच पाहिजेत.साल्हेरच्या शैलकडा आणि खडकात कोरलेल्या जिन्यांच्या वाटा,देवगिरीच्या खंदक आणि अंधारी,अलंगची टाकी,धोडपची फोडलेली माची,हष्रची दगडांत कोरलेली वाट,अंकाई ची लेणी,हडसरचे दगडात कोरलेले दरवाजे,शिवनेरीचे सात दरवाजे,राजगडच्या माच्या व बालेकिल्ला.रायगडचे टकमक टोक,जंजीरयाचा अभेद्य बुरुज,विजयदुर्गची तिहेरी तटबंदी,लोहगडचा गेट-वे म्हणजे द्वारमंडळ आणि खंदक,परंड्याच्या तोफा,औशातील जमिनीखालच्या विहीर,पन्हाळ्यावरील कोठारे,कंधारची जीभी अशी अनेक किल्ल्यावरची वेगळी वैशिष्टे अभ्यासून पहावीत.
दुर्ग दुर्गम करावयाचे अनेक प्रकार पाहण्यात येतात. दगड वापरून दुर्ग बळकट करतातच,पण दगड काढून नह्वे; तर दगड अदृश्य करूनसुद्धा दुर्ग अभेद्य केल्याची उदाहरणे आहेत.

राजगडचे उदाहरण द्यायचे झाले,तर राजगडच्या तीन माच्या आणि अभेद्य बालेकिल्ल्याला लागलेला एकून दगड अंदाजे २० दशलक्ष टन आहे.एवढा दगड कोठून आणला,त्याच्या खुणाही तेथे नाहीत.दगडाची खाणही जवळ आढळत नाही.पाण्याच्या टाक्यातून जर दगड काढला असे म्हणावे, तर तेथून काढलेला एकून दगड अंदाजे ३ लक्ष टन एवढाच भरेल,मग उरलेला १७ लक्ष टन दगड कोठून आणला असेल?प्रश्न अनुत्तरीतच राहतो.

दुसरे उदाहरण आहे दगड काढू टाकून दुर्ग बळकट करण्याचे.खर तर हे थोड चमत्कारिकच वाटते;पण याचे उत्तम उदाहरण म्हणजे देवगिरी.येथे दगड काढून टाकून दुर्ग बळकट केल्याचे आढळून येते.संभाजीनगर जवळ देवगिरीचा ह डोंगर आहे.किमान अंदाजे ८० लाख टन दगड डोंगरातून काढून टाकलेला आहे.खंदकाच्या तळापासून वरपर्यंत छिन्नी लावलेली उंची ५० मीटर तरी नक्कीच आहे.ऐन खंदक हि १०ते१२ मीटर खोल आहेत.या खंदकातून वर गेल्यावर पुन्हा दगड काढून एक चक्राकार वाट केलेली आहे.या वाटेला 'अंधारी'असे म्हणतात.देवगिरी दुर्गच्या खोदकामाला राष्ट्रकुंतानि सुरवात केली असावी.वेरुळच्या लेण्यांच्या खोदकामाच्या वेळेस हे खोदकाम झाले असावे.'अंधारी'चे प्रवेशद्वार त्याला साक्ष आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात दगड काढून दुर्ग अभेद्य केल्याचे हे एक अपूर्व उदाहरण आहे.

तिसरे उदाहरण म्हणजे दगड अदृश्य केल्याचे आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तरेला वाघोटन नदीच्या मुखाशी 'विजयदुर्ग' हा किल्ला आहे.तीन बाजूला पाणी आणि एका बाजूला खुश्की असे त्याचे स्वरूप आहे.एका ठिकाणी तीन,तर एका ठिकाणी चार तटबंद्या बांधून दुर्ग बळकट केला आहे.

१९९१ मध्ये गोव्याची 'नॅशनल इंस्तिट्यूट ऑफ अशिनाग्राफी' आणि 'वेस्टर्न नेव्हल कमांड' यांनी एक संयुक्त मोहीम राबवली होती.पाणबुडे पाण्यात उतरवून त्यांनी अभ्यास केला.तेथे १२२ मीटर लांब व ७ मीटर रुंद आणि ३ ते ४ मीटर उंच अशी भिंत आढळून आली.प्रचंड आकाराच्या शिळांचा वापर तेथे त्या भिंतीसाठी केल्याचे आढळले.हि भिंत वरून दिसत नाही.म्हणजेच दगड अदृश्य आहे.१७२० च्या आसपास काही इंग्रजी जहाजे या भिंतीला आदळून फुटली.गोव्याच्या पोर्तुगीजांना इथे समुद्रात काहीतरी बांधकाम आहे याची कल्पना होती.दुर्ग अभेद्य करण्याचे हे अजोड उदाहरण आहे;पण ते अदृश्य आहे,अशी अनेक वैशिष्टे आपल्याला दुर्गकोटांच्या बाबत आढळून येतील.

या व अशा अनेक गोष्टींचा आपापल्या परीने वेगवेगळ्या इतिहास संशोधकांनी अभ्यास केला आहे.अनेक वैशिष्टे निदर्शनास आणून दिलेली आहेत.मात्र,यांची सांगड विज्ञान युगात घालणे महत्वाचे वाटते.
इतिहासकारांनी हि दुर्गांसंबंधी अभ्यास केला आहे.त्यासंबंधी सापडलेले अनेक दाखले अभ्यासलेले आहेत.दुर्ग्कोत बांधताना त्यांची वैशिष्टे काय,कोट बळकट करताना घेतलेली काळजी व रचना,नैसर्गिक वैशिष्टे,यासबंधी अनेक संशोधकांनी आपली मते वेगवेगळ्या स्वरुपात मांडलेली आहेत.